दिपोत्सव : बालपणीचा | दिवाळीची आठवण | Diwali Festival 2022
वाटलंच मला म्हणुन आज एक नवा लेख तुमच्यासाठी. हे वाचुन कदाचित काही वेळ तुम्ही भुतकाळातल्या आठवणींत जाणार हे नक्की.
Diwali Diva |
परिक्षा आटोपली कि मग सुरुवात व्हायची घर सफाई कामाला! आम्ही चार भावडं असल्याने कामाची समान विभागणी केली जायची. त्यांत सर्वसमावेशकता हाच निकष असायचा. दिरंगाई, कंटाळा झाला कि दिवाळीपुर्वीच आईच्या हाताचा फराळ पाठीवर मिळायचा.
सफाई करतांना आजी सांगायची "पोरांनो, घराची नीटनेटकी स्वच्छता म्हणजे घरी लक्ष्मीला आमंत्रण. स्वच्छतेचा अंगिकार म्हणजे लक्ष्मीचा वास. पण, हो नुसतीच घराची नाही, त्याच बरोबर मनाचीही स्वच्छता महत्त्वाची. मनातली मरगळ, पुर्वग्रहांची झाळी-झळमटं सुद्धा काढुन टाका."
तिची वाक्य उत्साह द्बिगुणीत करायची. आमची ही स्वच्छता मोहिम २/३ दिवस चालायची. कामासोबतच आजीच्या नवनव्या पदार्थांची मेजवानी असायची. विशेष म्हणजे दरवर्षी एकच काम न देता दरवर्षी वेगळं काम दिलं जायचं. जेणेकरुन आम्हांला सगळ्या कामाची सवय व्हावी. घरातल्या अनेक गोष्टी त्यावेळी माहित व्हायच्या. अगदी शांततेत, नियोजनांत हे सत्र पुर्ण व्हायचं. diwali celebration 2022
सगळीकडे घरोघरी हेच वातावरण असायचे. मग,सुरुवात व्हायची फराळाचे पदार्थ बनवायला. आई, आजी मुद्दामचं ताईला शेजारी बसवुन तिच्याकडुन काही कामं करवुन घ्यायच्या. ताईने नकारघंटा दिलीच तर तिला ऐकायला मिळायचं.
"अगं सासरी गेल्यानंतर कसं करशील? तुझ्या सासरी आमचा उद्धार नको व्हायला."
चिवडा, लाडु, करंजी, अनारसे, शेव, शंकरपाळे असे एक ना अनेक पदार्थ काही तासांत बनवुन तयार असायचे. त्यांत माझं कुतुहल वेगळचं असायचं. शंकरपाळे हे असं पदार्थाचं नाव का? हा प्रश्न मी आजीला हमखास विचारायचो.
Diwali-Faral |
मग,आजी त्यावर तिची मनोविश्लेशक कथा सांगायची. तो पदार्थ बनवत असतांना येणारा खुमखुमीत सुवास. अहाहा! आजकालच्या रेडिमेड फराळाची त्यासोबत तुलना केवळ अशक्यच आहे. तयार पदार्थ कधी खायला मिळणार? ही उत्सुकता असायचीच. पण, तो पदार्थ लक्ष्मीपुजनाच्या वेळी नैवैद्य दाखवुन नंतरच खायला देणार असा आजीचा दंडक असायचा.
मग, व्हायची कपडे खरेदी. ताई, दादा, मी असे एक-एक करत खरेदी पुर्ण व्हायची. किमान एक दिवसाचा हा कार्यक्रम असायचा.
मला पुर्णतः आठवतयं, नरक चर्तुदशीला भल्या पहाटेच एक आजी मला घ्यायला यायच्या. माझी मौंज झाली त्या वर्षीपासुन त्या दरवर्षी पहाटे ४ वाजताच घ्यायला यायच्या. एव्हाना दिवाळीपर्यंत थंडीला सुरुवात व्हायची. नदी किनारीच त्यांचा जुना वाडा होता. मातीचा घट्ट सुगंध, सारवलेल्या सुरेख भिंती, अंगणातली नक्षीदार रांगोळी व त्याभोवती पणत्यांची आरास, दारावर डुलणारं आंब्याच्या पानांचं, झेंडुच्या फुलांचं तोरण, वाड्याच्या मागील बाजुंस गर्द, दिमाखात डुलणारी झाडी.
तिथेच एक मोठा दगड असायचा. त्यावरच मला बसवुन सुगंधी तेलाने, उटण्याने शरीर रगडलं जायचं.
(रगडणं मुद्दाम शब्दप्रयोग करतोय कारण, त्या आजी अन् काकु मला त्याच पद्धतीने उटणं, तेल लावायच्या.😃😃😃) पण, त्यात मायेचा ओलावा असायचा.
तांब्याच्या मोठ्या घंगाळातील कडक-कडक पाणी अंग शेकुन काढायचे. नदी किनारी वाडा, त्यात गर्द झाडी. त्यामुळे, अंगावर येणार्या थंडीची गार झुळुक त्या गरम पाण्यामुळे शांत व्हायची. त्या आजी मला अगदी लहान बाळाप्रमाणे अंघोळ घालायच्या. त्याच दरम्यान त्या मला नरकासुर-श्रीकृष्णाची गोष्टसुद्धा सांगायच्या. औक्षण करतांना उजळणार्या दिव्याचा प्रकाश मनालाही तेजोमय करीत असे. मग, पेलाभर मिळणारं दुध हवहवसं वाटायचं. तो पुर्ण दिवस त्यांच्याच घरी जायचा. दरवर्षी त्यांच्याकडुन मिळणार्या अनोख्या भेटवस्तुचं अप्रुप आजही कायम आहे. दुपारचं जेवण झालं, कि त्या पुन्हा मला घरी सोडवायला यायच्या.
लक्ष्मीपुजन झालं कि आजी स्वतः आम्हांला दिवाळीचा फराळ आग्रहाने खाऊ घालायची. पाडव्याला आजी व आई, भाऊबीजेच्या ( bhaubeej ) दिवशी ताई औक्षण करायच्या. त्यावेळी मनात प्रश्न असायचा. ह्यांनाच का म्हणुन दरवेळी भेटवस्तु, पैसे द्यायचे?
पण, त्या देत असलेल्या आशिर्वादाचं मोल वाढत्या वयाबरोबर वृद्धिंगत होत गेलं.
त्यानंतर मामाच्या गावी जाण्याची लगबग असायची. मामा किमान १ तास अगोदरच बस स्थानकावर आम्हांला घ्यायला हजर असायचा. त्यानंतर काही दिवस मामाकडेच उर्वरीत सुट्टीचा उत्तरार्ध पुर्ण व्हायचा. तिथेच रोज काही मित्रांसमवेत खेळण्यात सुट्टी जायची.
मला इथे करमत नाही. हा प्रश्न आमच्या मनात तेव्हा कधीच डोकावत नव्हता. दिवाळीच्या सुट्टीत शुद्धलेखन, पाढे पाठ करणे असा घरचा अभ्यासदेखील असायचा. चार दिवसांसाठी येणारा दिवाळी उत्सव कालपरत्वे बदलत गेला.
परंतु, आजीने सांगितलेल्या गृह स्वच्छतेबरोबरच पुर्वग्रह, दुषित विचारांची झळमटं काढण्याचं काम अजुनही अपुर्ण आहे. आईच्या संसारी विचारांचा तळ अजुन आम्हांला उमगलाच नाही. पप्पांसोबत तेव्हा केलेल्या दिवाळी खरेदीचा आनंद आज ॲमेझाॅन, फ्लिपकार्टद्वारे होणार्या खरेदीत शोधण्याचा प्रयत्न करतोय. ताई दादासोबत होणारी फटाक्यांची आतिषबाजी वाढत्या वयासोबत कुठे हरवली कोण जाणे?
वाड्याची शोभनियता सिमेंटच्या जंगलात कुठेतरी लुप्त झाली आहे. नरकासुर-श्रीकृष्णाची कथा त्या आजींइतकी विस्तृतपणे सांगणारं कुणी आजपर्यंत गुगलवर सापडत नाही. साबणाचे विविधांगी प्रकार त्या सुगंधी उटण्यापुढे थिटे वाटतात. रेडिमेड फराळ फार काळ जिभेवर रेंगाळतच नाही. विजेचा लख्ख प्रकाश त्या वाड्यापुढच्या अंगणात काढलेल्या रांगोळी भोवतालच्या पणती समोर धुसरच वाटतो. rangoli for diwali
Rangoli with Diya |
जबाबदार्यांच्या गराड्यात शाळेचा सुट्टीतला गृहपाठ अपुर्णच राहतो आहे. मामाकडे हल्ली कामानिमित्तच जाण्यात बालपणीची सुट्टी परत घ्याविशी वाटते आहे. ola, uber cab च्या जमान्यात मामाही आता आमची वाट बघत बस स्थानकावर तासन् तास उभा रहात नाही. मामाकडे गेलोच तरी मोबाईलवरच असंख्य गेम खेळतो, त्यामुळे बालपणीचे मैदानी खेळ अन् ते खेळणारे सवंगडी विस्मृतीत गेले आहेत.
विचारांची पातळी इतकी मोठी झाली आहे, कि त्यामुळे किमान सणासुदीला थोरामोठ्यांचे आशिर्वाद घ्यायला कमीपणा वाटतोय.
अन् वेळेचा तर अपुराच ठेवा असल्याने पत्राद्वारे तर नाहीच नाही. पण, Whatsapp वर आलेला Message नातेवाईकांना पाठवयलाही वेळ अपुरा पडतोय.
वेळ, वय यानुसार खरचं सगळं इतकं बदलतं का?
असो,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! / Happy Diwali 2022
लेखन—: पंकज सविता सुधाकर पाठक.(नाशिक)